उमरगा: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.22 रोजी आयक्यूएसी,रसायनशास्त्र आणि औद्योगिक रसायनशास्त्र विभाग तसेच महाविद्यालयाचे कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने अन्न व भेसळ यासंबंधीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी अध्यक्षस्थान भूषविले आणि कार्यशाळेचे उद्घाटन केले.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे तसेच कला शाखेचे व प्राचार्य डॉ. पद्माकर पिटले,आयक्यूएसी समन्वयक डॉ. विनोद देवरकर हे उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अन्न भेसळ व त्याच्या चाचण्या समजून घेण्याबरोबरच ते ओळखण्यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे ,ज्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा ते उपयोगी राहील असे प्रतिपादन केले.या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.विलास इंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे अन्न भेसळ आणि त्याचे परिणाम तसेच अन्न भेसळ आणि जागरूकता यावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात अन्न भेसळ यासंदर्भात रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.व्हीं.एस.सूर्यवंशी यांनी पॉवर् पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अन्न भेसळ,कारणे,भेसळ ओळखण्यासाठी असलेल्या विविध रासायनिक चाचण्या, अन्न भेसळीचे आरोग्यावर होणारे परिणाम/ आजार,भेसळीचे प्रकार, कायदे,यावर सविस्तर असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वेगवेगळी अन्न भेसळ ओळखण्याठीच्या असलेल्या रासायनिक चाचण्या आणि त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना सांगितले आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी ते प्रात्यक्षिक करून पाहिलें या सत्रासाठी प्रा.डॉ.डी. व्हीं.बोंदर, प्रा.बी.टी.व्हणाले आणि प्रा.कु.जे.आर.समाने यांनी प्रात्यकक्षिकासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी आदर्श महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जब्बार मुल्ला, प्रा.पी. डी.पाटील, प्रा.बी.के.लबडे, रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.एससी आणि एम.एससी वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.
सध्या जगात अन्न भेसळ हे एक गंभीर आव्हान असून जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सहाशे दशलक्ष लोक आजारी पडतात तर चार लाख वीस हजार लोक मृत्यू पावतात. अन्नपदार्थांमध्ये विविध घटकाचा वापर करून भेसळ केली जाते, असे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अपायकारक पदार्थाची भेसळ केल्यामुळे अन्नपदार्थाचा दर्जा खालावतो. विविध सण समारंभाच्या वेळी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांमध्ये अखाद्य घटकांची भेसळ केली जाते. स्वच्छता न बाळगणाऱ्या अन्नपदार्थ पुरविणाऱ्या व्यक्तीमार्फत सुद्धा अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळे रोगजंतू प्रसारित होऊ शकतात त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाले,उघड्यावर अन्न विक्री करणारे यांच्याकडील खाद्यपदार्थ घेताना त्याचा दर्जा पहावा. दरवर्षीच्या अन्नभेसळ आणि त्यामुळे होणारे गंभीर आजार याचा विचार केल्यास अन्नभेसळ तपासणीच्या पुरेशा अन्नचाचणी प्रयोगशाळा उभारणे तसेच या संदर्भातील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे.