राज्यातील आर्थिक अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती बँकांची बैठक सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
उमरगा : मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सध्यस्थितीत आर्थिक निधीची अडचण असणाऱ्या वर्धा, बुलढाणा, नागपूर, नाशिक, बीड व उस्मानाबाद या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीसाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुरेश बिराजदार यांनी बँकेच्या विविध अडचणी बैठकीत मांडत बँकेला मदतीचे आवाहन केले . सहकार विभागाचे उपसचिव संतोष पाटील , सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, व्यवस्थापकीय संचालक, दिघे व डॉ. माने मुख्य सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य, सहकारी बँक मुंबई, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धाराशिव हे उपस्थित होते. धाराशीन बँकेंचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय एम. गायकवाड हे उपस्थित होते. सदरील बैठकीत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेची बाजू मांडत माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक बिराजदार यांनी बँकेला सालसन २०१३ पासुन शासनाचे कोणत्याही प्रकारची इतर बँकेसारखी मदत मिळालेली नाही. शासनाकडुन भागभांडवलापोटी साधारण रु.७४.०० कोटीची मागणी केलेली आहे. सदरचा प्रस्ताव हा शासन दरबारी यापूर्वी दाखल केलेला आहे. तो मंजुर करण्यात यावा. या बँकेने साखर कारखान्यास केलेल्या कर्ज वाटपापोटी शासनाने दिलेली थकहमी तातडीने देण्यात यावी. शासनाकडील साखर कारखान्याची थकहमी साधारण रु.२४४.०० कोटी आहे. तसेच यासंबंधी सविस्तर चर्चा . उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत झालेली आहे. साल सन २०२२ मध्ये स्थापन केलेल्या देवरा समितीने उस्मानाबाद जिल्हा बँकेकडून शासकीय थकहमीवर दिलेल्या कर्जाची १३५ कोटी इतकी रक्कम मान्य केली होती. शिवाय मागील कालावधीमध्ये राज्य सहकारी बँकेचा कोणत्याही अटी शर्थी शिवाय थकहमीचा निधी मंजुर करुन वितरीत करण्यात आला आहे. हाच न्याय उस्मानाबाद जिल्हा बँकेला लावुन बँकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे होणारा २४५ कोटीचा निधी मंजुर करुन वितरीत करावा.भविष्यामध्ये बँका सुव्यवस्थीत चालु राहणे करिता तसेच नवनवीन बँकींग व्यवसाय करण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून शासनाच्या थकहमीवर किमान ३ ते ४ टक्के व्याजदराने रु.३००.०० कोटी मंजुर करावेत. अशी मागणी श्री बिराजदार यांनी बैठकीचे अध्यक्ष सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना केली आहे .