लोहारा:- औसा मतदारसंघाचे जलसंपदा विभागाशी संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आ. अभिमन्यु पवार यांच्या विनंतीवरून जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी निम्नलिखित निर्देश दिले: निम्न तेरणा प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेचे सुधारित प्रशासकीय अंदाजपत्रक मार्च 2025 पूर्वी शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावे आणि सदरील सुधारित अंदाजपत्रकाच्या 15 एप्रिल, 2025 पूर्वी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात यावी. नागझरी ता. लातूर परिसरातील परराज्यात वाहून जाणारे पाणी तावरजा प्रकल्पात आणण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च 2025 पूर्वी शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा. तावरजा नदीवरील सेलू येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे नूतनीकरण काम करण्यासाठी 16 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून विशेष बाब म्हणून सदरील प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. माकणी निम्न तेरणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने पाणीसाठ्यात 25% पेक्षा अधिकची तूट निर्माण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. माकणी निम्न तेरणा प्रकल्पात साठलेल्या गाळामुळे परराज्यात वाहून जाणारे हक्काचे पाणी तेरणा उपखोऱ्यात पुनर्स्थापित करण्यासाठी योग्य जागेची पाहणी करून अहवाल शासनास सादर करावा तसेच अतिरिक्त भूसंपादन करण्याऐवजी प्रकल्पाची उंची वाढवता येईल का याची तपासणी करावी. तेरणा नदीवरील किल्लारी – एकोंडी रस्ता, किल्लारी – एकोंडी रस्त्यावरील पूल व कोकळगाव बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातील तेरणा नदीवरील कोकळगाव – कमलेवाडी रस्त्यावरील पूल बांधकाम करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत. लातूर जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे 4 कार्यालय आहेत, प्रशासकीय सोयीसाठी हे चारही कार्यालय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर या मंडळास जोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर करावा आणि सदरील प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंजुरीची कारवाई तातडीने पूर्ण करण्यात यावी. किल्लारी भाग 2 येथे स्मशानभूमी उभारण्यासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. निम्न तेरणा प्रकल्प व तावरजा प्रकल्प सह राज्यातील सर्व कालव्यांच्या बाजूचे सर्व्हिस रोड हे जिल्हा परिषद कडे वर्ग करण्यासंदर्भात सचिव, ग्रामविकास विभाग यांच्यासोबत पत्रव्यवहार करावा. औसा विधानसभा मतदारसंघ 100% सिंचनाखाली आणण्यासाठी कृतीआराखडा तयार करावा.स्व.विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना कोयना प्रकल्पातील मराठवाड्याच्या हक्काचे 25 TMC पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय झाला होता, त्यानंतर प्रत्यक्षात 23.66 TMC पाणी मंजूर करण्यात आले आणि आता त्यातील केवळ 7 TMC पाणी देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असून मराठवाड्याच्या हक्काचे उर्वरित 16.66 TMC पाणी सुद्धा मराठवाड्याला देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी पुर येतो, त्यात कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्याने पुराचा धोका वाढतो. सदरील पुराचे पाणी माढ्यात आणण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली असून हे पाणी मध्यावरून तुळजापूर मार्गे तेरणा नदीपात्रात आणण्यात यावे जेणेकरून औसा मतदारसंघासह संपूर्ण लातूर जिल्ह्याची पाणीटंचाई कायमची दूर होईल अशी विनंती मा मंत्री महोदयांना केली असता तपासणीअंती विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. कळसुबाई शिखर परिसरातील वाहून जाणारे पाणी गोदावरी खोरा मार्गे मांजरा व तेरणा खोऱ्यात आणता येईल का याची तपासणी करावी अशी विनंती मा मंत्री महोदयांना केली. तेरणा प्रकल्पाची व तेरणा प्रकल्पातील कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रके तयार करून मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून सदरील अंदाजपत्रकांना विशेष बाब म्हणून मंजुरी प्रदान करण्यात यावी अशीही विनंती आ.अभिमन्यु पवार यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना केली.