किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात — आ. अभिमन्यु पवार

0
311

 

लोहारा :-  महाप्रलयकारी किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाले असून अ, ब व क वर्गवारीच्या भूकंपग्रस्त गावांमध्ये उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची दुर्दशा झालेली आहे. भूकंपानंतर बहुतांश गावांमध्ये नवीन वस्त्या तयार झाल्या, त्या वस्त्यांमध्ये निर्मितीपासूनच पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे राज्य शासनाने किल्लारी भूकंपग्रस्त गावांमध्ये रस्ते, नाली व विद्युतीकरण सारखी सर्व प्रकारची पायाभूत सुविधा विकासकामे करण्यासाठी स्वतंत्र कृतिआराखडा तयार करावा यासाठी औसा विधानसभा मतदार संघाचे आ. अभिमन्यु पवार मागच्या 3 वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. मागच्या आठवड्यात आ. अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम राबविण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्य प्रशासनाच्या वतीने किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम कृतिआराखडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने लातूर व धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडून किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अहवाल मागविण्यात आला आहे. किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अ, ब व क वर्गवारीच्या भूकंपग्रस्त गावांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करणे, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करणे, रोजगार निर्मिती करू शकतील अशा प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर्स विकसित करणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतकऱ्यांना शेततळे/सिंचन विहीर/गोठे इ. घटकांचे लाभ मिळवून देणे, जिल्हा परिषद शाळा दर्जोन्नत करणे व विस्तारित कुटुंबांना आवास योजनांचे लाभ मिळवून देणे इ. कामे करण्याचा माझा मानस आहे, असे आ.अभिमन्यु पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here