प्रा .सुरेश बिराजदारांची विधानपरिषद संधी हुकल्याने कार्यकर्त्याची निराशा

0
93

धाराशिव: – जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना व मागील अनेक वर्षापासून सत्तेत असूनही सत्तेपासून वंचित असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सत्तेत राहूनही निधी ,विकास कामे यापासून वंचित रहावे लागत आहे . राष्ट्रवादी पक्षात झालेली मोठी बंडाळी , फुट यानंतरही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत जिल्ह्यातील पक्षाची धुरा सांभाळत अडचणीच्या काळात सुरेश बिराजदारांनी धाराशिव जिल्हयातील पक्षाचा किल्ला यशस्वीपणे लढवला .   एकनिष्ठ, अभ्यासू, व कार्यकर्त्याचा पाठिंबा असलेल्या सुरेश बिराजदार यांना लोकसभेची तयारी करण्यास सांगून ऐनवेळी दादांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सौ .अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर श्री बिराजदार यांना विधान परिषदेवर घेऊन धाराशिव जिल्ह्याला ताकद देण्याचे आश्वासन अजित दादा पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या जाहीर सभेमध्ये दिले होते . सुरेश बिराजदार यांनीही माघार घेत लोकसभा उमेदवार अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यांचा प्रचार करत कार्यकर्त्यांनाही कामाला लावले . यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुरेश बिराजदार यांच्या ऐवजी परभणी येथील श्री .विटेकर यांना उमेदवारी दिली आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला . यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला राज्यात घवघवीत यश मिळूनही जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नसल्याने धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता विवंचनेत सापडला आहे . त्यातच नवीन शासनाने दिनांक १७ रोजी जाहीर केलेल्या विधान परिषद निवडणुकीत परत तीसऱ्यांदा सुरेश बिराजदार यांना डावलत श्री खोडके यांना उमेदवारी दिली .

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सबंध जिल्हयावर दबदबा होता . जिल्ह्यात झालेल्या बंडाने पक्षाची मोठी क्षती झालेली होती . अशा परिस्थितीत सुरेश बिराजदार यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देत जिल्ह्यातील पक्ष यशस्वीपणे उभा राहिला . असे असताना लोकसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या विरोधी पक्षातील आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने नातेगोत्याचे राजकारण उघड झाले . विरोधी पक्षात राहूनही राष्ट्रवादीची लगाम आपल्या हातीच राहावी अशी मनसा असलेल्या लोकप्रतिनिधीमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुरता खचला . पक्षातील निष्ठावंतांना न्याय न देता बाहेरील पक्षातील विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला होता . आज जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार, खासदार नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांना विकास निधी ,विकास कामांपासुन वंचित रहावे लागत आहे . जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी परवड होणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here