धाराशिव :- ग्रंथालय ही खऱ्या अर्थाने गावची सांस्कृतिक केंद्रे असून यामधील विविध लेखकांची पुस्तके वाचून अनेकजण प्रेरित होतात.मात्र,हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वाचक संख्या कमी होत चालली असून ही अतिशय गंभीर बाब आहे.त्यामुळे ग्रंथालयांनी ई-बुक्स तयार करून वाचन संस्कृती टिकवावी.पुस्तके म्हणजेच ग्रंथ हे सोशल मीडियावर अँटिबायोटिक म्हणून काम करीत असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे विभागाचे सहायक संचालक सुनील हुसे यांनी केले.धाराशिव येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन २४ व २५ मार्च रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.आज धाराशिव ग्रंथोत्सव -२०२४ चे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून बोलतांना श्री.हुसे म्हणाले की,जिल्ह्यातील लेखकांनी प्रकाशित केलेली पुस्तके जिल्ह्यातील प्रत्येक ग्रंथालयामध्ये ठेवलीच पाहिजेत.त्यामुळे स्थानिक साहित्यकांचे लिखाण वाचून वाचकांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होते.सध्या वाचन संस्कृतीवर सध्या फेसबुक,युट्यूब इन्स्टाग्राम,ट्विटर व ए.आय. यासारख्या सोशल मीडियाचे आक्रमण होत असून त्याच्या आहारी सुज्ञ नागरिक देखील गेले असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक वाचनालयांनी किमान १० ई बुक्स तयार करून ती आपल्या गावातील शालेय विद्यार्थी व इतर वाचकांचा ग्रुप करून त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन केले.मोबाईलचा वापर हा संपर्कासाठी करण्यात आला होता.मात्र मोबाईलने संपर्कहीन केले असल्याचे सांगत श्री. हुसे म्हणाले की,हे टाळण्यासाठी ग्रंथ हे अतिशय प्रभावी व महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गावात हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरविण्यासह कीर्तनकाराच्या माध्यमातून पुस्तक वाचनाचे आवाहन करावे असे त्यांनी सांगितले.जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे म्हणाले की,पुस्तक वाचनामुळे समाजामध्ये जे-जे मतभेद व भेदभाव असतात ते मिटविण्याचे काम ग्रंथ करतात.चांगल्या साहित्यिक व लेखकांचे साहित्य वाचावे.संस्कृती कशी वाढेल ती कशी टिकेल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचनामुळे मन समाधान व चांगले तयार होते असे सांगत ते म्हणाले की,ग्रंथोत्सवाचे आयोजनामागे वेगवेगळ्या विषयावर विचार मंथन व्हावे,विचार जपला पाहिजे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.तर सध्या आपला बराचसा वेळ मोबाईलवर जात असल्यामुळे ग्रंथालयांनी वाचकाकडे आपले ग्रंथ घेऊन जाऊन त्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सुर्यवंशी व साहित्यिक युवराज नळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर कलाशिक्षक शेषनाथ वाघ व त्यांच्या चमूने जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता ऍड चौगुले यांनी पसायदानाने केली.प्रारंभी सहायक संचालक सुनील हुसे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते फित कापून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते सभागृहामध्ये सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गोरखनाथ कानडे यांनी मांनले.यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक, व्यवस्थापक ग्रंथप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ग्रंथोत्सवामध्ये विविध पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत.यामध्ये शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार पुणे यांचा स्टॉल असून पुस्तके खरेदी करण्यासाठी पुस्तक प्रेमींनी दिवसभर गर्दी केली होती. सकाळी धाराशिव शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रंथदिंडीचे पूजन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले. या दिंडीत अनेकांचा सहभाग होता.