धाराशिव :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय,मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने आयोजित धाराशिव ग्रंथोत्सव २०२४ मधील २५ मार्च रोजी झालेली कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली.या कार्यक्रमात सहा बालकथाकारांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनिता गुंजाळ- कवडे होत्या. वसुंधरा गुरव,तनुजा मंजुळे,सुषमा मोरे,सृष्टी कोळी व अनुज कांबळे यांनी सहभाग घेतला.वसुंधरा गुरव हिने चिमणी-कावळ्याची अर्धवट राहिलेली गोष्ट सांगत श्रोत्यांची मने जिंकली.तनुजा बालाजी मंजुळे हिने जुबेदा आणि तिच्या भावातील प्रेमळ नात्याची हृदयस्पर्शी कथा सादर केली.सुषमा मोरे हिने भिमा पैलवानाने किसन शेतकऱ्याची वस्तू परत कशी केली हे प्रभावीपणे मांडले.सृष्टी कोळी हिने द.मा. मिरासदार यांची ‘गणिताचा तास’ ही कथा दमदार पद्धतीने सादर केली.अनुज कांबळे याने शंकर पाटील लिखित ‘धिंड’ या दारूबंदीविषयक कथेने श्रोत्यांना प्रभावित केले.जान्हवी कुलकर्णी हिने आबासाहेब घावटे लिखित ‘खुशाल चेंडू’ प्रभावीपणे सादर केली.श्रीमती गुंजाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालकथाकारांना मार्गदर्शन केले तसेच ‘बसची वारी लय भारी’ ही कथा सांगून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे,व.ग.सुर्यवंशी आणि युवराज नळे यांनी सहभागी कथाकारांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शाम नवले यांनी केले, ज्ञानेश्वर माऊली पाटील अनसुर्डेकर यांनी आभार मानले.कथाकथनाच्या या सोहळ्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.