उमरगा :- तालुक्यातील पेठसांगवी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या २००४-०५ च्या दहावीच्या बॅचचा गेट-टु-गेदर उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंगळवारी (ता.१) रोजी झालेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपली आठवणींची शिदोरी उघडली आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ज्येष्ठ शिक्षक लिंबराज यमगर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सुभेदार, किरण वाडकर, मनोहर माळी आणि विद्यमान मुख्याध्यापक उद्धव कोटे, शिक्षक देवराव पाटील, सतीश चव्हाण, करण बाबळसुरे, व्यंकट पंडगे, श्याम भालके, अशोक सोनवणे, माया भोसले, मोहिनी खुणे, परमेश्वर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून झाली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित माजी शिक्षकांचा विद्यमान शिक्षकांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेसह पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि हार घालून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यमान शिक्षकांचाही माजी शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष क्षणांमध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका माया भोसले यांचा वाढदिवस साजरा केला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भारावून गेले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनप्रवासाचा परिचय करून दिला. सॉफ्टवेअर इंजिनियर, रिक्षा चालक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, मोटर मेकॅनिक, शेतकरी, उद्योजिका आणि गृहिणी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मोलाचे कथन केले.कार्यक्रमादरम्यान विद्यमान मुख्याध्यापक उद्धव कोटे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या शाळेवरील प्रेमाचे आणि निष्ठेचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली असता, उद्धव कोटे या शिक्षकांनी विज्ञान विषयाचा धडा शिकवला, ज्यामुळे संपूर्ण परिसर पुन्हा शाळेच्या दिवसांत रमून गेला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सुभेदार यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना भावनिक मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “या शाळेत आजपर्यंत कधीही अशा प्रकारचा गेट-टु-गेदर झाला नव्हता. हा कार्यक्रम आम्हा सर्व माजी शिक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.” माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी 500 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट दिली, जी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. शेवटी, सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे आर्थिक नियोजन काशिनाथ पाटील यांनी पाहिले तर यशस्वी आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत बिराजदार यांनी, तर आभार प्रदर्शन पवन बोंडगे यांनी केले. हा स्नेहमेळावा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता माजी विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि बंध निर्माण करणारा ठरला.