तलावातील गाळ काढण्याच्या कामात ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा– जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार 

0
51

धाराशिव :-  गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे.या योजनेमुळे तलावातील सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास तसेच तलावात पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होते.जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात तलाव आहेत आणि त्या तलावात गाळ साचलेला आहे,तो गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी,कृषी उपसंचालक बी.व्ही.वीर व भारतीय जैन संघटनेच्या प्रतिनिधी कांचनमाला संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती..पुजार म्हणाले की, या योजनेत अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.ज्या संस्थांनी यापूर्वी गाळ काढला आहे, त्या अनुभवी संस्थांना गाळ काढण्याचे काम शासन नियमानुसार देण्यात येईल तसेच त्या संस्थेचा तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे.सिमेंट नाला बंधारा ज्या नाल्यावर आहे,त्या नाल्यातील गाळ काढण्यात यावा. तालुका यंत्रणांना सोबत घेऊन जलसंधारण विभागाने या योजनेची कामे तातडीने सुरू करावी. अशासकीय संस्थांची पारदर्शकपणे निवड करावी.ज्या संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ आहे व धर्मदाय नोंदणी आहे तसेच तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आहे हे लक्षात घेऊनच संस्था निवडाव्यात,असे ते म्हणाले. गाव पातळीवर या योजनेची कामे सुरू करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात यावे असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,तालुकास्तरीय समितीची शिफारस संबंधित कामासाठी घेण्यात यावी. या योजनेअंतर्गत कोणत्या यंत्रणांनी कोणती कामे करावयाची आहे हे आधी निश्चित करावे.सक्षम असलेल्या ग्रामपंचायतींनी तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे.तालुकास्तरीय यंत्रणांच्या बैठकांमध्ये सेवाभावी संस्था व संबंधित गावचे सरपंच यांना बोलावून त्यांना या योजनेबाबत विस्तृत माहिती देऊन अवनी अॅपबाबत देखील माहिती द्यावी असे श्री.पुजार यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेच्या मालकीची ५९२ आणि मृद व जलसंधारण विभागाची ५३२ तलाव असून जिल्हा परिषदेच्या १९७ तलावात गाळ आहे.४५० सिमेंट नाला बंधारे असून २९२ अर्ज स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतीचे नाला खोलीकरणाच्या कामासाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.महामुनी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here