रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी ; ई-केवायसीसाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ

0
88

धाराशिव,:-  सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे.ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास रेशन/धान्य वितरण थांबविण्यात येऊ शकते.त्यामुळे कार्डधारकांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसीसाठी प्रत्येक रेशनकार्डावरील सदस्याने रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशिनवर अंगठा लावून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र,यामध्ये सर्व्हर डाऊन होणे,किंवा सदस्यांचे नोकरी- व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणे यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.राज्य शासनाने यापूर्वी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत दिली होती.परंतु आजअखेर फक्त ६९ टक्केच लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे.उर्वरित ३१ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे.यामुळे शासनाने ई-केवायसी पूर्णतेसाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.दरम्यान,लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी आता दोन पर्याय उपलब्ध आहेत रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशिनवरून आणि मोबाईलवरून ई-केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाने “Mera e-KYC Mobile App” व “Aadhar Face RD Service App” उपलब्ध करून दिले आहेत.हे ॲप वापरण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. गुगल प्ले स्टोअरवरून दोन्ही ॲप्स डाउनलोड करून इन्स्टॉल करा.”Mera e-KYC Mobile App” उघडून राज्य व ठिकाण निवडा.आधार क्रमांक टाकून आलेला OTP भरून सबमिट करा.माहिती पडताळणी करून “Face E-KYC” वर क्लिक करा.डोळे उघडझाप करून सेल्फी द्या.प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘E-KYC पूर्ण झाली’ असा संदेश दिसेल.जिल्हा प्रशासनाकडून सर्व रेशनकार्डधारकांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी दिलेल्या मुदतीत “Mera e-KYC Mobile App” व “Aadhar Face RD Service App” वापरून आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,जेणेकरून शिधावाटपात अडथळा येणार नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here