धाराशिव :- पाण्याचा अपव्यय टाळा आणि त्याचा जपून वापर करा,कारण पाणी ही नैसर्गिक देणगी असून ती शाश्वत टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून त्याचा वापर करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा समारोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मित्रचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे-पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधिक्षक संजय जाधव,जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता विजयकुमार थोरात,कार्यकारी अभियंता दिनेश खट्टे,अमोल मदने, प्रविण चावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील बोरी,मांजरा,तेरणा,बेनीतुरा व सिना नद्यांच्या पाण्याचे तसेच तुळशीचेही पुजन करण्यात आले.यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.पालकमंत्री सरनाईक बोलतांना पुढे म्हणाले की,जलसंपत्तीचे व्यवस्थापन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे.वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि हवामान बदल यामुळे पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गरज वाढत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि विवेकी वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.त्यांनी शाळा,महाविद्यालये,ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांना पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. पावसाळ्याच्या आधी जलसाठ्यांची साफसफाई,नद्या-नाल्यांचे खोलीकरण आणि जलकुंभांची निर्मिती ही कामे करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याच्या साठवणुकीसाठी तांत्रिक उपाय,पुनर्भरण विहिरींची निर्मिती, जलशुद्धीकरण यंत्रणा आणि जलपुनर्वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की, फक्त सरकारी योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही.जनतेच्या सहभागाशिवाय पाणी संवर्धन शक्य नाही.त्यामुळे गावोगाव जलदूत तयार करा,शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाची बीजे रोवून त्यांना या चळवळीत सामील करण्याचे आवाहनही श्री.सरनाईक यांनी यावेळी केले.यावेळी बोलताना मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे होत आहेत.कृष्णा मराठवाडा योजनेतून जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत घटणी बॅरेजमधून पाणी लिफ्ट करण्यासाठी काम वेगाने सुरु आहे.तसेच जिल्ह्यात तामलवाडी,वडगाव सि.,कळंब,तेरखेडा येथे छोट्या एमआयडीसी उभा करण्याचे कामही सुरु आहे.तुळजाभवानी मातेचे मंदिर आणि परिसराताचा विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की,शेतकर्यांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.तसेच शेतकर्यांनी पाण्याचा काटकसरीने योग्य वापर करावा असे सांगण्यात येते.त्याला शेतकर्यांकडून प्रतिसादही मिळतो.शेतकरी ठिंबकच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याचा वापर करतात.परंतू त्या शेतकर्यांना अनुदान वेळेवर मिळत नसल्याचे सांगून पालकमंत्री यांनी या प्रश्नी लक्ष दयावे असे ते यावेळी म्हणाले.आमदार कैलास पाटील म्हणाले, शेतीसाठी ठिंबकचा वापर करावा. जिल्ह्यात कॅटीव्हेअरची संख्या मोठी आहे.त्यावर बॅरेजेस बांधल्यास जिल्ह्यात सिंचनात मोठी वाढ होणार आहे.तसेच शासनाकडून मराठवाड्यासाठी देण्यात येणार्या ५४ टीएमसी पाण्यापैकी धाराशिव-बीड-लातूरचा हिस्सा किती हे निश्चित करुनच प्रकल्प आराखडा तयार करावा,असे मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता विजयकुमार थोरात यांनी केले.सुत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले.आभार कार्यकारी अभियंता दिनेश हत्ते यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्ह्यातून महिला भगिनी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.