मुंबई – नीती आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रारुप कसे असावे या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली.व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट’ बाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत प्राथमिक सादरीकरण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.नीती आयोगाने ‘विकसित भारत २०४७’ चा आराखडा तयार केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यानेही व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून त्याचे प्रारुप कसे असावे, त्यामध्ये काय समाविष्ट करावे याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. या व्हिजन डॉक्युमेंटचा पहिले प्रारुप आराखडा १५ ऑगस्ट पर्यंत केंद्र शासनाकडे सादर करायचा असून अंतिम आराखडा हा २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करावयाचा आहे. प्रगतिशील,शाश्वत,सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे.तसेच हा आराखडा उपयोगात आणता येईल आणि अंमलात आणण्याजोगा असावा.व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानानुसार योगदान दिल्यास हे उत्कृष्ट डॉक्युमेंट तयार होईल.त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांची मते जाणून घ्यावे.यासाठी व्हॉट्सॲप चॅट बॉट,ऑनलाईन सर्व्हे आदी माध्यमांचा उपयोग करावा.तसेच व्हिजन डॉक्युमेंटचा लोगो तयार करण्यासाठी नागरिकांसाठी स्पर्धा ठेवावी,अशा सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मॅकेन्झी या संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.