धाराशिव :- जिल्ह्याच्या हरित भविष्याचा पाया घालणाऱ्या “मिशन धाराशिव – ५० लक्ष वृक्ष लागवड व संवर्धन” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस),तुळजापूर कॅम्पस येथून जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते १६ मे रोजी वृक्षारोपण करून करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,टिसचे कॅम्पस संचालक प्रा.बाळ राक्षसे,सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश चादरे,तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व टिसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी .पुजार यांनी सांगितले की,हे मिशन केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून,हवामान बदल,जलस्रोतांचा अभाव आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या संकटांवर मात करणारी एक हरित चळवळ आहे.या उपक्रमाद्वारे पर्यावरण रक्षण,जलसंधारण,स्थानिक रोजगारनिर्मिती आणि लोकसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे.“हे मिशन म्हणजे सामाजिक जनजागृती आणि कृतीतून उभं राहिलेलं हरित भविष्याच्या दिशेने सामूहिक पाऊल आहे,” असे मत व्यक्त करत जिल्हाधिकारी .पुजार यांनी प्रत्येक नागरिक,ग्रामपंचायती,शाळा,संस्था आणि शासकीय यंत्रणा यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.टिस तुळजापूर कॅम्पसच्या यशस्वी वृक्षलागवड व संवर्धन कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि हा कॅम्पस जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले.डॉ.मैनाक घोष यांनी या अभियानात ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.त्यांनी गावांमध्ये योग्य प्रजातींची निवड, लागवडीसाठी योग्य जागा ठरवण्याचे आवाहन केले.तसेच,‘एक विद्यार्थी – एक झाड’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम निर्माण करावे,असेही आवाहन केले.प्रा.बाळ राक्षसे यांनी सांगितले की,टिस तुळजापूरने स्थानिक प्रजातींची लागवड, मृदासंवर्धन,पाणी साठवण उपाययोजना आणि सर्वसमावेशक सहभागातून यशस्वी प्रयत्न केले आहेत.हे झाडं केवळ रोपे नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याचे बीज आहेत,असे ते म्हणाले.टिस कॅम्पस दीर्घकालीन भागीदारीतून ही चळवळ पुढे नेईल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.सामाजिक कार्यकर्ते .गणेश चादरे यांनी हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर वृक्ष लागवड आणि संवर्धन हा सर्वात प्रभावी व शाश्वत उपाय असल्याचे सांगितले.पर्यावरणीय जबाबदारी वैयक्तिक कृतीतून व्यक्त करण्याचे आवाहन करत त्यांनी “वाढदिवसाला पार्टी व डिजिटल नको – झाडे लावा, झाडे जगवा व झाडे वाटा!” हा संदेश दिला.महिलांचा, तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक असून,शासन आणि समाज एकत्र आल्यासच पर्यावरणाचे खरे रक्षण शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.गणेश चादरे, शंकर ठाकरे,आनंद भालेराव,सचिन भालेकर,श्री.धनके आणि श्याम पवार यांचे मोलाचे योगदान लाभले.