आपत्तीच्या पार्श्वभूमीवर  यंत्रणांनी  सतर्क  राहून समन्वयाने काम करावे —  जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार 

0
156

धाराशिव :-  आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून,जिल्ह्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून समन्वयाने काम करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापनच्या पूर्वनियोजन बैठकीत जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) शाम गोडभरले,भुम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,जलसंपदाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.यावेळी पुजार यांनी सांगितले की, यापूर्वी आपत्ती निर्माण झालेल्या गावांची यादी तयार करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी त्या गावांची तातडीने पाहणी करावी.या पाहणीअंतर्गत गावातील पायाभूत सुविधा,रस्ते,पूल,पाणीपुरवठा योजनांची स्थिती,तसेच संभाव्य धोके यांचा आढावा घ्यावा.विशेषतः पूर,अतिवृष्टी यासारख्या आपत्तींचा धोका असलेल्या गावांवर विशेष लक्ष द्यावे,या पाहणीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील तलावांची पाहणी करून त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत,असे आदेश देण्यात आले आहेत.तलावांच्या बांधकामात त्रुटी असल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो,ज्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांची तपासणी आणि दुरुस्तीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.यामुळे आपत्तीत होणारे नुकसान टाळता येईल.पुजार पुढे म्हणाले,अग्निशमन दल, पोलिस,महसूल विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्तीच्या वेळी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करावे,यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी,नागरिकांमध्येही आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी,आपत्तीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये,याबाबत माहिती देण्यासाठी गावागावांत जागृती शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी .पुजार यांनी यावेळी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले.येणाऱ्या काळात पावसाळा आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता,सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे.आपत्तीच्या वेळी नागरिकांचे जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तलाव,बंधारे व जलाशयांची तांत्रिक दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.जलसाठ्यांची स्थिती तपासून संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना घेऊन काम करावे. संबंधित विभागांनी तलावांची पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा,असे निर्देश यावेळी देण्यात आले.

*मुख्यालय न सोडण्याचे आदेश*

आपत्तीच्या काळात तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असल्याने सर्व विभागप्रमुख व अधिकारी यांनी पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.मुख्यालयात उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा,असे जिल्हाधिकारी .पुजार यांनी स्पष्टपणे सांगितले.जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आवश्यक त्या पूर्वतयारी नागरिकांनी करावी.तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहनही करण्यात आले.जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारीला सुरुवात केली असून,यंत्रणांनी सज्ज राहून लोकांच्या सुरक्षेसाठी दक्षतेने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या पूर्वनियोजन बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी,नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here