लोहारा:– महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत. यामुळे महायुती सरकारचा उबाठा गट शिवसेना लोहारा तालुका यांच्यावतीने निषेध करुण तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्जमाफीचा प्रश्न, प्रोत्साहन अनुदान न मिळणे, ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेतील फसवणूक, शेतमालासाठी परदेशातून होणारी आयात, शेतकरी सन्मान योजनेतील अडथळे, हमीभाव व शीतगृह योजनेतील अपयश, तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा ढिसाळ व्यवहार यांचा सर्वतापयुक्त उल्लेख करण्यात आला आहे. महिला सुरक्षा आणि लाभ योजनांमध्ये होत असलेली उपेक्षा, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ न होणे, तरुणांना नोकऱ्या न मिळणे, बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसणारी दिरंगाई यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये निराशा पसरली आहे. या सर्व गंभीर समस्यांकडे राज्य शासन आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या समस्या लवकरच न सुटल्यास रास्ता रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन तसेच तहसील कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उबाठा गट शिवसेना जिल्हा संघटक दीपक जवळगे, उबाठा गट शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी सभापती विकास भंडारे, शहर प्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर, युवासेना शहरप्रमुख प्रेम लांडगे, महेबूब गवंडी, राजू स्वामी, रघुवीर घोडके, बळीराम गोरे, अनिकेत स्वामी, सोमनाथ भोंडवे, विजयानंद ओवाडे, राजकुमार सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोभे, दत्ता गिरी, चेतन गोरे, प्रशांत गिराम, किशोर सूर्यवंशी, धनराज जाधव, रविकांत भोंडवे, काकासाहेब सूर्यवंशी, तुकाराम वाकळे, हरिभाऊ गोरे यांच्यासह उबाठा गट शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.