नव्या रेल्वेमार्गासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर उमटतोय सकारात्मक प्रतिसाद, भूम-परंडा-वाशी रेल्वेमार्गासाठी संघर्ष समितीचे शिष्टमंडळ आग्रही

0
76

लोहारा :– पंढरपूर ते शेगाव या प्रस्तावित नव्या रेल्वेमार्गाच्या मागणीला आता राजकीय स्तरावरही बळ मिळू लागले आहे. भूम-परंडा-वाशी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची भेट घेतली. या भेटीत संघर्ष समितीने रेल्वेमार्गाचे व्यापारी, सामाजिक आणि धार्मिक महत्त्व स्पष्ट करत हा प्रकल्प मार्गी लागावा, अशा मागणीचे निवेदन सादर केले. या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, आम्ही पूर्ण ताकदीने या मागणीच्या पाठीशी आहोत. लवकरच माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या प्रस्तावाची माहिती देणार आहोत. त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे ही बाब अधिक प्रभावीपणे मांडता येईल. तसेच हा विषय केवळ रेल्वे प्रकल्पाचा नसून, तो सामान्य जनतेच्या दळणवळण, रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. त्यामुळे या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. या भेटीत संघर्ष समितीच्या सदस्यांनी या मार्गाद्वारे पंढरपूर, वाशी, भूम, परंडा, गेवराई, जालना, खामगाव आणि शेगाव या शहरांना होणाऱ्या जोडणीसंबंधी माहिती दिली. या मार्गामुळे प्रवाशांना तसेच व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. समितीच्या प्रयत्नांना जिल्हा स्तरावरून असा पाठिंबा मिळाल्याने नव्या रेल्वेमार्गासाठी सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. यावेळी समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here