महाराष्ट्राबरोबरच जिल्ह्याच्या वाट्यालाही अभूतपूर्व निधी, संकल्पसे सिद्धीतक झेप — आ. राणाजगजितसिंह पाटील

0
11

लोहारा :– यूपीएच्या १० वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राच्या वाट्याला साधारणपणे १ लाख कोटी रुपये निधी मिळाला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राज्याच्या वाट्याला आलेला निधी युपीए सरकारच्या दहापट म्हणजेच १० वर्षात १० लाख कोटी रुपये एवढा आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे राज्याला ऐतिहासिक फायदा झाला आहे आणि महाराष्ट्राबरोबरच धाराशिव जिल्ह्याच्या वाट्यालाही अभूतपूर्व निधी मिळाला आहे, अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली. धाराशिव येथील भाजपाच्या प्रतिष्ठान भवन कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षाच्या यशस्वी पुर्ततेबद्दल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदीजी यांच्या कार्यकाळात देशभरात झालेल्या अनेक अभूतपूर्व योजना, उपक्रम आणि विकासकामांचा आलेख यावेळी मित्रचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थितांसमोर सादर केला. माता-भगिनींच्या आयुष्याला अधिक सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दलही जिल्ह्यातील माता-भगिनींच्या वतीने त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि धाराशिव जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण आणि भरीव बाबींची माहिती दिली. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलग तीन वर्ष जिल्हा राज्यात अव्वल ठरला. जिल्ह्यातील दीड हजारपेक्षाही अधिक युवकांनी या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःसह त्यांनी इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीमध्ये तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांना वेग आला आहे. देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रीय टेक्निकल टेक्सटाईल मिशन हे धोरण जाहीर केले आहे. त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीलाही होणार आहे. त्यामुळे देशातील आणि परदेशातील इच्छुक गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा आणि वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यातून जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. पर्यटन, रेल्वे त्याचबरोबर रस्ते विकास, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, महामार्गावर विद्युत व्यवस्था, विविध प्रकारचे अनुदान अशा अनेक बाबींच्या माध्यमातून जिल्ह्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व असा निधी प्राप्त झाला आहे. एकट्या धाराशिव जिल्ह्यात ६,५०० कोटी रूपयांची २४ राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर केली आहेत. त्यातील ११ कामे पूर्ण झाली असून उर्वरित १३ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. धाराशिवकरांची गरज व मागणी लक्षात घेवून तुळजापूर-नळदुर्ग, तुळजापूर-औसा, धाराशिव शहरातील बाय पास, तुळजापूर बाय पास, सिंदफळ व येडशी येथे उड्डाणपूल, या कामांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूरी दिली. सूरत-चेन्नई महामार्ग, सोलापूर-धुळे, सोलापूर-उमरगा असे महामार्गाचे जाळे धाराशिव जिल्ह्यात आज निर्माण झाले आहे. युपीए सरकारच्या काळात धाराशिव जिल्ह्यात केवळ १९५ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होता. आज त्याच राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील लांबी ४१८ किलोमीटर एवढी झाली आहे. मागील केवळ ११ वर्षांच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी २२३ किलोमीटर इतकी वाढली आहे. प्रधानमंत्री विमा योजनेच्या माध्यमातून खरीप २०२० पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास २००० कोटी रुपये मिळाले असून संकल्प केला आणि तो सिद्धीस नेला म्हणून तर संकल्प से सिद्धीतक हा मूलमंत्र घेऊन देशातील आणि राज्यातील आपले सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अखंड कार्यरत आहे, असे मित्रचे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मजुर फेडरेशन अध्यक्ष सतिश दंडनाईक, ॲड.नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, प्रल्हाद नाना धनुरे, चंद्रकांत काकडे, पांडुरंग आण्णा पवार, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here