धाराशिव:– पावसाळ्यात टायफॉईड,गॅस्ट्रो,डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.प्रत्येकाने पिण्याचे पाणी उकळून किंवा क्लोरीन टाकून प्यावे, उघड्यावरचे किंवा शिळे अन्न खाणे टाळावे.डासांचे उत्पादन रोखण्यासाठी पाणी साचू न देणे,गटारे व नाल्यांची स्वच्छता करणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे आणि आठवड्यातून एक ‘कोरडा दिवस’ पाळणे आवश्यक आहे.झोपताना मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ताप,उलटी,जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.कोणताही ताप अंगावर काढू नये किंवा स्वतःहून औषधोपचार करू नये.सर्पदंश किंवा तत्सम आपत्कालीन प्रसंगी १०२ किंवा १०८ वर संपर्क साधावा.सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सज्ज ठेवण्यात आले असून जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्षही कार्यरत आहे.नागरिकांनी स्वच्छता व खबरदारी बाळगून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Home आरोग्य व शिक्षण पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी– जिल्हा प्रशासनाचे आवाहन