राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या ; सर्वत्र मोसमी पाऊस सक्रिय, मंत्री मंडळ बैठकीत आढावा 

0
24

मुंबई  :–  राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टर वर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्यातुलनेत यंदा केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामातील पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत असे त्यांनी सांगितले. अहिल्या नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे श्री. रस्तोगी यांनी सांगितले. राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी धरणात ५१५ मीटर पर्यंत पाणी साठा करण्यात येईल असे सांगितल्याची माहिती श्री. कपूर यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीपुर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here