लोहारा :– राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.27 जून 2025 रोजी तालुक्यातील दहावी, बारावी तसेच नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे होते. यावेळी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, सुप्रसिद्ध कवि, अभ्यासू लेखक व्याख्याते प्रा.डॉ.अनंत राऊत, सह आयुक्त इतर बहुजन व मागासवर्ग अमोल ताकभाते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर साठे, माजी सरपंच नागन्ना वकील, राष्ट्रवादी कॉग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सूर्यकांत सांडसे, राष्ट्रवादी कॉग्रेस उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, गोविंदराव साळुंके, अमर बिराजदार, प्राचार्य रामदास ढोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शाळांतील इयत्ता दहावी, बारावी व नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील उदयपूर गावातील शेतकरी तुकाराम रावण पवार यांनी आपल्या मुलांचा विवाह मुलगा सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा रजिस्टर पद्धतीने करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला म्हणून त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे उपक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना अनंत राऊत म्हणाले की, आपली कालची परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय आहे आणि मला उद्या काय करायचं आहे इतका सोपा जगण्याचा मार्ग आहे. असं समाधानी आयुष्य तुमच्या वाट्याला यावं. एखादा माणूस चांगला असला तरी त्याला नष्ट करण्याचं काम चुकीची संगत करते. आपले क्षेत्र निवडत असताना विचार करून निवडा व एकदा क्षेत्र निवडले तर ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा असा मूलमंत्र गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. अनंत राऊत यांनी दिला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सुरेश बिराजदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास करा, परिश्रम घ्या असे आवाहन केले. तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सहाय्यक आयुक्त अमोल ताकभाते यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी नगरसेवक जालिंदर कोकणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, अमोल ओवंडकर, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी बाबा शेख, भानुदास चव्हाण महाविद्यालययाचे प्राचार्य ढोकळे सर, व्हाईस प्राचार्य कर्दूळे मॅडम, ठेले मॅम, कलबुर्गी सर, माजी नगरसेवक गगन माळवदकर, प्रकाश भगत, अभिजित लोभे, मुक्तार चाऊस, रफिक पटेल, प्रशांत सोमवंशी, वैजीनाथ कागे, माधवराव पाटील, दादासाहेब जानकर, ब्रम्हा सोमवंशी, ॲड.सयाजी शिंदे, मोहन शिंदे, मुरली पाटील, पत्रकार गिरीश भगत, स्वप्निल माटे, मनोज देशपांडे, सचिन रणखांब, गोपाल माने, लक्ष्मण बिराजदार, व्यंकट राजपूत आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.