उमरगा : शहरात दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 05:00 ते 6.30 वाजेदरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विनापरवाना रॅलीविरोधात दि.28 रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनतर्फे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरगा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रॅलीत मोठ्या संख्येने मोटारसायकली व चारचाकी वाहने सहभागी झाली होती. रस्त्यावर उघडपणे आतिषबाजी, हुर्रेगिरी व शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीसंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.फाउंडेशनतर्फे मांडण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अशा बेकायदेशीर रॅल्या व शक्तीप्रदर्शनामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येते, तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो व शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते. कालच्या रॅलीमुळे वाहतूक विस्कळीत झाली तसेच महिला, वृद्ध व लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी व अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट उर्फ राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, कविता साळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


