उमरगा :- शहरातील विविध प्रभागांमध्ये अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने दि.17 रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना तातडीच्या उपाययोजनां करावे असे निवेदन देण्यात आले.शहरातील अनेक भागांत साचलेले पाणी, उघडी गटारे, कचऱ्याची वेळेवर उचल न होणे तसेच सांडपाणी रस्त्यावर साचून राहणे यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांसाठी ही परिस्थिती गंभीर असल्याचेही फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले.निवेदनाद्वारे शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करणे, साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करणे, उघड्या गटारांवर झाकण बसविणे, कचरा संकलन व साफसफाई नियमित करणे, तसेच डास प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली.नगर परिषदेने याबाबत तातडीने दखल घ्यावी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनने व्यक्त केली आहे.निवेदनावर सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, करिम शेख, धानय्या स्वामी, बबीता मदने, राजू बटगिरे, संतोष चव्हाण, प्रदीप मोरे, कविता साळी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


