*२० तास जिल्हा रुग्णालयात ठेवले प्रेत*डॉक्टरवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी*दवाखाना की कत्तलखाना ? डॉक्टरांनी जाहीर करावे
धाराशिव – तालुक्यातील शिंगोली येथील शांताबाई दत्तू गवळी या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी वेळेवर औषध उपचार न केल्यामुळे त्यांना आपला जीव गमविण्याची दुर्दैवी घटना दि.२१ डिसेंबर ऊघडली आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत ते प्रेत तब्बल २० तास रुग्णालयातच ठेवले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी दि.२१ डिसेंबर रोजी पोलीस अधिकारी व रुग्णालयातील डॉक्टर यांनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ते नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमधील फरशीवरच ठिय्या मांडला. जोपर्यंत संबंधितावर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी तेथून काढता पाय घेत प्रेत ताब्यात घेतले. ही दुर्दैवी घटना धाराशिव शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयात दि.२१ डिसेंबर रोजी घडली आहे. त्यामुळे शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजी व दुर्लक्षितपणा पुन्हा चव्हाट्यावर आला असून सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ करून शासकीय नोकरीवर असणारे डॉक्टर स्वतःच्या खाजगी दवाखान्यात थांबवून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची कशी पिळवणूक करतात ? हे समोर आले आहे. विशेष म्हणजे नातेवाईकांनी हा कत्तलखाना आहे का दवाखाना ? हे संबंधित डॉक्टरांनी जाहीर करावे असे खुले आव्हान देत विविध प्रश्न विचारले आहेत.ऍडमिट केले असता पेशंटची बीपी अचानक वाढली डॉक्टर व सिस्टर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या महिला रुग्णाचा जिल्हा रुग्णालयातील बाथरूममध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये घडली आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टर व नर्स यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ते प्रेत तब्बल 19 तास रुग्णालयातच ठेवले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ते प्रेत गावाकडे नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृत शांताबाई दत्तू गवळी यांच्या बहिणीच्या मुलाने दि.२१ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणले होते. त्यासोबत शांताबाई गवळी यादेखील आल्या होत्या. मात्र त्यांना रुग्णालयात आल्यानंतर अर्ध्या तासाच्या फरकाने अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी तेथील संबंधित डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी काही झाले नाही असे सांगितले. मात्र पंधरा मिनिटाच्या फरकाने पुन्हा नातेवाईकांनी डॉक्टरांना शांताबाईवर उपचार करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी इसीजी करून घेतले. त्यावेळी सर्व नॉर्मल आहे असे सांगत तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असा सल्ला दिला. मात्र नातेवाईकांनी ऍडमिट करून घ्या असे सांगितल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये ऍडमिट करण्यासाठी पेपर तयार करून महिला वार्ड मध्ये त्या रुग्णास घेऊन जाण्यास सांगितले. तेथील उपस्थित आरोग्य सेविकांनी उपचार न करताच त्यांना तेथे बसून ठेवले. नातेवाईकांनी या महिलेला डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सलाईन किंवा इतर औषधे सुरू करावीत अशी विनंती केली असता तुम्ही कोण सांगणार ? तुम्ही आमचे मालक आहात का ? तुम्हाला कोणाला सांगायचे ते सांगा आमचे कोण काय करणार नाही… असे अरेरावीची उत्तरे देऊन औषधोपचार करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर डॉक्टरांनी फोन करून संबंधित आरोग्य सेविकांना सूचना केल्यानंतर त्यांनी उपचार सुरू केला. दरम्यान लघु शंकेसाठी शांताबाई बाथरूमकडे गेल्या असता चक्कर येऊन त्या तेथेच कोसळल्या. बाथरूम वरून का येत नाहीत म्हणून नातेवाईक बाथरूम कडे पाहण्यास गेले असता त्या तेथे निश्चित पडल्या होत्या. नातेवाईकांनी स्ट्रेचरवर आणले. संबंधित परिचारिकांनी डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनी आयसीयू वार्डमध्ये दाखल करून घेत उपचार सुरू केले. मात्र पंधरा मिनिटांच्या फरकाने शांताबाई मृत झाल्याची घोषित केले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत आक्रोश केला. तसेच जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत प्रेत हलवणार नाही तसेच त्याचे पोस्टमार्टम करणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे रात्रभर ते प्रेत रुग्णालयातच पडून होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले व जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिया दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी तेथे आले त्यांनी चर्चा करून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यावर चौकशी अंतिम कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी तेथून काढता पाय घेत जिल्हा रुग्णालयातील प्रेत आपल्या गावी नेले. शिंगोली येथे शांताबाई यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
*पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन*
शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नाहकपणे एका महिलेचा बळी गेला आहे. या रुग्णालयात कार्यरत असलेल्या संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लेखी आश्वासन दिले आहे. पंधरा दिवसाच्या आत संबंधितांवर कारवाई न केल्यास आम्ही राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन शेरखाने, जिल्हाध्यक्ष ॲड गणपती कांबळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिला. यावेळी जिल्हा सचिव शांतिनाथ शेरखाने, शहराध्यक्ष शहाजी शेरखाने, राज्य कार्यकारणी सदस्य धोंडीराम वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष संपत शेरखाने, जिल्हा संघटक साहेबराव शेरखाने, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब गवळी आदींसह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.