उमरगा – तालुक्यातील लातूर- उमरगा रोडवरील माडज पाटी जवळ दि.17 रोजी सायंकाळी साडेसात (7.30) वाजण्याच्यासुमारास पिकअप जीप व दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यु झाल्याची भयानक घटना घडली आहे.
संबंधित अपघातात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मंगळूर येथील दिपक वसंत रामपूरे (वय-२७) व आकाश सुर्यकांत रामपूरे (वय-२५) हे दोघे सख्ये चुलत भाऊ कांही कामानिमित्त उमरगा शहरात आले होते. येथील काम आटोपून ते दुचाकीवरून (क्र. एम एच २५ – ए एन ०५५४) गावाकडे परत निघाले असता, एक ट्रक चालक पिकअप ला (क्र. एम एच २५ पी ३४०८) धडक देऊन निघून जात असताना, याच क्षणी पिकअप चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दिपक रामपूरे, आकाश रामपूरे या दोघांचा मृत्यु झाला तर जीपमध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या उमरगा तालुक्यातील येळी येथील दिंगबर गिरजप्पा कांबळे (वय-५७) या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. तर जीप चालक संतोष स्वामी व मारुती रेड्डी रा. दोघेही येळी (ता. उमरगा) जखमी झाले आहेत.
माडज येथील वैजिनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगांव (ता. उमरगा) येथील अजय कदम यांची उमरग्याकडे निघालेल्या पिकअप जीपला थांबवुन वैजनाथ काळे व अजय कदम या दोघांनी मिळून अपघाताग्रस्त तिघांना पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. तेथून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.