धाराशिव:- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आज माणसांसह मुक्या प्राण्यांवरही होत आहे.मात्र,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान शेतीमध्येही नवा क्रांतीकारक बदल घडवून आणत आहे.मनुष्य आणि प्राण्यांप्रमाणेच आता पिकांचेही “आरोग्य तपासणी” करून त्यावर योग्य उपाययोजना सुचविण्याचे काम एआय तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे.कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव विठ्ठल कांबळे यांनी आपल्या मिरचीच्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ती मशीन बसवून हा यशस्वी प्रयोग केला आहे.या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानाचा अंदाज,पाणी व्यवस्थापन,खतांची मात्रा आणि रोगसंदर्भातील माहिती शेतकऱ्याला अगदी वेळेवर मिळत आहे.परिणामी,पिके सुदृढ वाढत असून शेतकऱ्याच्या अतिरिक्त खर्चात बचत होत आहे.
*एआय तंत्रज्ञानाने पिकांसाठी अचूक मार्गदर्शन*
महादेव कांबळे यांच्या अडीच एकर शेतीपैकी एक एकर उस,एक एकर ज्वारी-हरभरा,आणि अर्धा एकर मिरची अशी शेती आहे.मिरचीच्या प्लॉटमध्ये एआय मशीन बसवले असून ते ठिबक सिंचन यंत्रणेशी जोडलेले आहे.ही मशीन दररोज सकाळी ६ वाजता हवामान,पाणी व्यवस्थापन,खतांच्या गरजा आणि संभाव्य रोगांबाबत माहिती SMS द्वारे पाठवते.त्या माहितीनुसार शेतकरी नियोजन करीत असल्याने पिके रोगमुक्त आणि जोमदार वाढत आहेत.अवघ्या ३० दिवसांत मिरचीचे पीक पावणे दोन ते दोन फूट उंच वाढले असून कोणताही रोग प्रादुर्भाव झाला नाही.एआय मशीनसाठी विजेची गरज भासत नाही,कारण ते सौरऊर्जेच्या पॅनेलवर चालते.या संपूर्ण यंत्रणेची किंमत ४०,००० रुपये,तर फिल्टर आणि ठिबक सिंचन यंत्रणेसाठी ५२,००० रुपये इतकी आहे.मात्र, आयसीआयसीआय फाउंडेशनच्या CSR निधीतून शेतकऱ्यांना केवळ १० टक्के लोकवाटा भरून हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे.शेळका धानोरा येथे यशस्वी झालेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर केल्यास शेतकरी खर्चात बचत करताना उत्पादन वाढवू शकतात.यामुळे शेतीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे !