लोहारा :- युनायटेड वे मुंबई यांच्या जल संजीवनी प्रकल्पामुळे सेंद्रिय शेतीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत, शेतकऱ्यांनी आपला उद्देश साध्य होईपर्यंत एकत्र राहिले पाहिजे असे मत उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी व्यक्त केले . ते युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, युनायटेड वे मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल रावल, माझी गटशिक्षणाधिकारी चव्हाण, विस्तार अधिकारी उंबरे आदीसह जल संजीवनी प्रकल्पाची टीम आणि प्रकल्पातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या. भारतीय हवामान बदलावरील आधारित कृती संशोधनात्मक प्रकल्प युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणीमध्ये लोहारा तालुक्यातील नागराळ, मार्डी, उंडरगाव, हिप्परगारवा आणि तुळजापूर मधील कार्ला आणि वाणेगाव या गावांमध्ये 2022 पासून कार्यरत आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नागराळ येथे संपन्न झाला. यावेळी असलकर यांनी प्रकल्पांतर्गत झालेल्या शेततळे, मत्स्य पालन, कुक्कुटपालन,फळबाग लागवड, सेंद्रिय निविष्ठा,सबसॉयलर प्रात्यक्षिक या कामाची पाहणी करून कौतुक केले. त्यासोबतच गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रकल्पाचे व्यवस्थापक अनिल रावल यांनी प्रकल्पाची संकल्पना आणि उद्देश उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पटके तर आभार अजित तांबोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन गडदे, नंदकुमार माने, नईम पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.