उमरगा :- महिला सबलीकरण या विषयावर चर्चा करताना आजच्या काळात खरच महिला अबला आहेत की सबला या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. महिला म्हणुन जीवनाच्या प्रवासात अनंत अडचणी येतात. पण त्या अडचणीवर कशी मात करता येईल. यासाठी बौद्धिक आणि मानसिक युक्त्या महिलांनी वापरून सामोरे गेल्यास महिला अबला म्हणुन राहणार नाहीत. त्या सक्षम आणि सबला महिला असतील. म्हणुन केवळ 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केले की महिला सबला होतील असे नाही. त्यासाठी महिलांनी सजग राहून स्वतः बरोबर इतराना मदत करावी त्यामुळे अबला महिला हे वाक्य कायमचे नष्ट होईल असे प्रतिपादन अँड. शुभदा पोतदार यानी केले.येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागातील वाणिज्य मंडळाच्या महिला सबलीकरण मुलीच्या कक्षा अंतर्गत जागतिक महिला दिन सप्ताह समारोपात “मुलींची महिला सबलीकरणसाठी भूमिका” या विषयावर चर्चा सत्र संपन्न झाले.यावेळी अँड पोतदार यानी विद्यार्थिनींना कसे वागावे, आणि आपल्या संरक्षण साठी असलेले विविध कायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.या चर्चासत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थिनींनी एक चांगली मुलगी, बहीण, सून,अत्या, आई, सासू बनण्यासाठी बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त करावी. यासाठीच महाविद्यालयात आयोजित अशा कार्यक्रमाची गरज आहे. विद्यार्थिनीनी याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.यावेळी योगिता इंगळे, विशाखा शेळके या विद्यार्थिनीनी आपली मनोगते मांडली. त्यानंतर खुल्या चर्चा सत्रात हुंडा, अत्याचार, न्यायालयीन विलंब, राजकीय हस्तक्षेप अशा अनिष्ट प्रथा आणि चालीरीती याबद्दल विद्यार्थिनीनी प्रश्न मांडले. त्याला या चर्चासत्रात मान्यवरांनी उत्तर दिले. या कार्यक्रमात सई भोसले या विद्यार्थिनीने दांड पट्टा आणि तलवार बाजी चे सादरीकरण केले. यावेळी डॉ अजित अष्टे, विजयकुमार मुळे, खंडू मुरलीकर , ओमप्रकाश पवार, अक्षता बिरादार, राणी बेंबळगे, यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिता मोरे, प्रास्ताविक श्रेजल पाटील आणि आभार मंजुषा बिराजदार यानी केले.कार्यक्रमासाठी वाणिज्य मंडळाच्या महिला सबलीकरण समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.