लोहारा:- राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शेत/पाणंद रस्ते विषयासंदर्भात धोरणात्मक बैठक पार पडली. ‘औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गतची प्रलंबित कुशलची देयके तात्काळ अदा करण्यात यावीत, क नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवड, गोठा, सिंचन विहीर इ.घटकांचे लाभ देण्यात यावेत आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही जॉब कार्ड्स वाटप करण्यात यावेत’ अशा मागण्या आ.अभिमन्यु पवार यानी या बैठकीत केल्या. ‘शेतरस्त्यांचा सातबाऱ्यावर इतर हक्कात समावेश करणे, खरेदी/विक्री दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये टोच नकाशाचा समावेश लवकरात लवकर करणे’ इ. मागण्यांचाही या बैठकीत आ.अभिमन्यु पवार यांनी पाठपुरावा केला. या बैठकीला धामणगांव रेल्वे चे आमदार प्रताप अडसड, काँग्रेस नेते आ.नाना पटोले, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, राजू तोडसाम, राजेंद्र पाटील, आणि रोहयो व वित्त विभागांचे अधिकारी उपस्थित होते.