उमरगा:- शहर, तालुक्यातील गुन्हेगारांवर व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांनी पोलिस अधीक्षक धाराशिव यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या कांही दिवसांपासून उमरगा शहर आणि तालुक्यातही गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दि.15 एप्रिल 2025 रोजी उमरगा शहरात एका तरुणावर चौघांनी भरदिवसा धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या कांही दिवस अगोदर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला उमरगा शहरात पोलिसांनी अटक केली होती. उमरगा शहरात कोयत्यासारखी शस्त्रे सोबत घेऊन फिरणाऱ्या गुंडांची संख्या वाढली आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्याचे, हाणामारीचे प्रकार घडू लागले आहेत. या प्रकारांमुळे उमरगा शहरातील शांतताप्रिय नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. उमरगा – लोहारा तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिक उपचारांसाठी, खरेदीसाठी उमरगा शहरात येत असतात. सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे हे नागरिक उमरगा शहरात येण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस अशा गुन्हेगारांवर कारवाई करतात, मात्र गुन्हेगारांवर कारवाई करू नये, अशा प्रकारचा दबाव कोणाकडून पोलिसांवर टाकला जात आहे का, हे उमरगावासियांना कळणे गरजेचे झाले आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून उमरगा शहरात येणाऱ्या मुला-मुलींची संख्या मोठी आहे. गेल्या चार-पाच दिवसांत घडलेल्या दोन्ही गंभीर गुन्हेगारी घटना या महाविद्यालयाच्या, खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही गुन्हेगारी मोडित काढून उमरगा शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत, मात्र कारवाई करू नये, यासाठी पोलिसांवर कुठून तरी दबाव येत असण्याची शक्यता आहे. पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या आणि गुंडांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे झाले आहे. पोलिसांनी दबाव झुगारून काम करावे, गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी भावना उमरग्यातील नागरिकांची आहे. लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी गुंडाच्या टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, ही विनंती. असे नाही झाले तर वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा विरोधात शांततेच्या मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक (धाराशिव) यांना दिल्या आहेत.