मुरूम : – तालुक्यातील नाईचाकूर गावचे भूमिपुत्र आणि पुणे येथील नामवंत उद्योजक अभिमन्यू पवार यांना केपीएम मीडिया हाऊस तर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा गौरव सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे येथे रविवारी (ता.२०) रोजी एका भव्य सोहळ्यात करण्यात आला. अभिमन्यू पवार यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी केवळ ३० रुपयांसह पुणे गाठले होते. आज मात्र त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि समाजाभिमुख विचारसरणीच्या जोरावर त्यांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळवणे, ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नसून उमरगा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे. पुण्यासारख्या स्पर्धात्मक आणि औद्योगिकदृष्ट्या समृद्ध शहरात आपल्या कल्पकतेच्या, चिकाटीच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावर अभिमन्यू पवार यांनी कंस्ट्रक्शन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र केवळ व्यवसायिक यशात रमून न राहता, त्यांनी “उत्पन्नात जितका आपला हक्क, तितकाच समाजाचा” या तत्त्वावर चालत गरजू विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध उपक्रमांना नियमित मदत केली आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले अभिमन्यू पवार राष्ट्रसंत तुकोबारायांच्या “बुडती हे जग न देखावे डोळा” या अभंगवचनानुसार कार्यशील जीवन जगत आहेत. पुण्यात वास्तव्यास असूनही आजही आपल्या गावाशी नाळ जोडलेली ठेवत, प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात आणि मातीतला गंध जपतात. केपीएम मीडिया हाऊसतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार फक्त व्यवसायिक यशासाठी नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी दिला जातो. रतन टाटा यांच्या समाजहिताच्या कार्यातून प्रेरणा घेऊन, ‘शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांना’ या माध्यमातून सन्मानित करण्यात येते. अभिमन्यू पवार यांच्या या यशाने संपूर्ण उमरगा तालुक्यात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे. गावकऱ्यांपासून ते तालुक्यातील नेते, अधिकारी आणि सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी या सन्मानाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.