हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
43

हिंगोली : — सामर्थ्यशील भारतासोबत सामर्थ्यशील महाराष्ट्र घडवतांना हिंगोली जिल्ह्याच्या सर्व आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. ते हिंगोलीतील विविध विकास कामांच्या उद्घाटन तसेच भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयास हिंगोलीचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव देतांना हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष निश्तिपणे दूर केला जाईल, जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आपण व्यक्तिश: महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे प्रयत्न करू, अशी निसंदिग्ध ग्वाही ही त्यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंगोलीतील 271 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव तसेच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, वसमत येथील हरिद्रा संशोधन केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला असून येथील तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्वप्रकारचे सहकार्य करू. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव तालुका निर्मितीचा निर्णय हा राज्यातील एकत्रित स्वरुपात होणाऱ्या तालुका निर्मितीच्यावेळी घेतला जाईल तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व व्यवस्था गोरेगावमध्ये विकसित केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार*

शेती क्षेत्रात दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून शेतीत मोठे परिवर्तन करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ देत आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भातील 5000 गावांमध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने आपण कृषी क्षेत्रात गुंतवणूक करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला मॅग्नेट प्रकल्पाची जोड दिली. आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना टप्पा 2 राज्यातील 7500 गावांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात हिंगोलीचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर योजनेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

*मराठवाडा दुष्काळमुक्त करणार*

राज्यात 4 नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याचे सांगतांना मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, या आपल्या संकल्पावर आपण काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूराच्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न कालव्याच्या माध्यमातून पाणी मराठवाड्यात आणून सोडण्यासाठी जागतिक बँकेचे सहाय्य घेण्यात आले असून पुढील महिन्यात या प्रकल्पावर काम सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

*महिला सक्षमीकरण योजना बलशाली करणार*

महिला सक्षमीकरण योजना येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, यांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल व त्या माध्यमातून त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत केली जाईल. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी योजनेंतर्गत 1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यात 25 लाख महिला लखपती दीदी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

*शासकीय कार्यालये लोकाभिमूख, नागरिकांना सुकर सेवा*

राज्यात 100 दिवस कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालये लोकाभिमूख करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसाच्या टप्पा 2 अभियानात 1250 सेवा घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले. येत्या दोन वर्षात या सेवा व्हॉटसअपवरही उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

*थेट विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात पहिला*

आज भारत जगामध्ये जपानला मागे टाकून 4 क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या दोन वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालात देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक 40 टक्के असल्याचे म्हटले. महाराष्‍ट्र आता विकासात थांबणार नाही तर पुढेच जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*पाच किमीमध्ये वैद्यकीय सेवा – राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर*

राज्यात दर पाच किलोमीटरच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने महिलांसाठी विविध योजना अंमलात आणल्या असून, या योजनांच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास आराखडा तयार करावा, जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा सहकारी बँकेची निर्मिती व्हावी. औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव तीर्थक्षेत्रांचा भरीव निधी देऊन विकास करावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here