धाराशिव :– हरित धाराशिव अभियानांतर्गत येत्या १९ जुलै रोजी १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याआधी आज सामाजिक वनीकरण विभागाच्या आळणी येथील रोपवाटिकेत ४ गुंठे जमिनीवर मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.या प्रात्यक्षिकात साग,सीताफळ, आवळा,कोरफळ,वड,कडुनिंब, सावर,पिंपळ,चिंच,पेरू,उंबर,फणस, रिठा,सिसव,मोगरा,गुलाब,बेल, अर्जुन,मोहगणी,तुळस,आंबा,बिबा अशा १२०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,संतोष राऊत,स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी व्ही.के.करे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी,जिल्हा उपनिबंधक श्री.साठे,उपविभागीय अधिकारी श्री.ओंकार देशमुख (धाराशिव),श्री.संजय पाटील (कळंब),श्रीमती वैशाली पाटील (भूम) तसेच तहसीलदार,सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी आणि विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.पुजार आणि डॉ.घोष यांनी पिंपळाचे रोप लावले.तसेच वट सावित्री पौर्णिमा निमित्त महिला अधिकाऱ्यांनी वडाचे रोप लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.