जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू

0
29

धाराशिव:–  जिल्ह्यात १६ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ग्रामीण भागात “स्टॉप डायरिया” ही मोहीम राबवली जाणार असून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शेलेंद्र चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी फुलारी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे.देशात ५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये अतिसार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण असून, उन्हाळा आणि पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या कालावधीत जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे ठरते.अभियानांतर्गत पाच वर्षांखालील मुलांना ओआरएस आणि झिंकचे मोफत वितरण केले जाणार असून,ते लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहणार आहे. पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार आहे.यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य आहे – “अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ”.पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांची वाढ होते. त्यामुळे गावागावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे,शाळा आणि शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.पाण्याचे निर्जलीकरण करून वापरण्यास लोकांना प्रवृत्त केले जात आहे.अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,महिला व बालकल्याण विभाग,शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवले जातील.गावपातळीवर जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम, माहितीपत्रके,चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाणार आहेत,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतिश हरीदास यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here