लोहारा:– आई-वडिलांच्या मायेचा ओलावा लाभायच्या आधीच नशिबाने जणू संकटांची छाया पसरवलेली — दोन महिन्यांची कोवळी ‘मनाली’! जीवनाच्या या कोवळ्या वळणावर तिचे छोटेसे हृदय कोरडे पडू नये म्हणून सह्याद्री अंकुर शिशुगृहाने तिला प्रेमाने आपलेसे केले आणि तिच्या आयुष्याला नवा सुरुवातबिंदू दिला. मनाली’च्या नाजूक हातांनी जरी आयुष्याचा प्रवास अलीकडेच सुरू केला असला, तरी तिच्या डोळ्यांत आशेची नवी ज्योत दिसतेय. सह्याद्री अंकुर शिशुगृहातील ताई-दादांनी प्रेमाची मिठी देत तिचा हात हातात घेतला आणि तिच्या आयुष्याच्या या नव्या पर्वाला मायेची कवच-कुंपण दिले. ही केवळ निवारा देणारी संस्था नव्हे — ही आहे प्रेम, संस्कार आणि नव्या आयुष्याची वाट दाखवणारी शाळा! सह्याद्री अंकुर शिशुगृह ही विनाअनुदानित विशेष दत्तक संस्था आहे, जिथे जन्मत:च अनाथत्व स्वीकारलेल्या बालकांना नव्या आयुष्याची उमेद दिली जाते. येथे केवळ चार भिंतींचा आसरा नव्हे, तर कोवळ्या हृदयांना प्रेमाची ऊब, सुरक्षेची खात्री आणि शिक्षणाची दिशा दिली जाते. नुकत्याच एका महिन्याच्या कालावधीत दोन बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचा हसू हा समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिकासाठी प्रेरणेचा दीप आहे. संपूर्ण दत्तक प्रक्रिया बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके आणि मार्गदर्शक डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था निःस्वार्थ सेवा, माया आणि संवेदनशीलतेचा वसा जपत कार्यरत आहे. ही निष्पाप कोवळी फुलं केवळ जगावीतच नव्हे, तर उमलावीत, बहरावीत आणि आत्मनिर्भर व्हावीत यासाठीच आमचा प्रयत्न आहे,” असे डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांनी सांगितले. समाजातील दातृत्वशील, संवेदनशील नागरिकांनी या पवित्र कार्यात आपले योगदान द्यावे, जेणेकरून अशा अनेक ‘मनाली’च्या आयुष्याला प्रकाश मिळेल, असेही आवाहन त्यांनी केले. सह्याद्री अंकुर शिशुगृहात सध्या तीन मुली आणि दोन मुले अशा पाच नाजूक जीवांनी हसत-खेळत मायेच्या झुल्यावर झुलण्यास सुरुवात केली आहे. समाजाच्या सहकार्याच्या हातभाराने या निष्पाप जीवांचे भवितव्य नक्कीच उजळेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.