लोहारा :– निलंगा मतदारसंघाच्या अनुषंगाने महसूल विभागातील विविध बाबींची आढावा बैठक आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतली. यावेळी शेतरस्ते, राशन पुरवठा, पिक विमा तसेच प्रमाणपत्र वाटपांविषयी चर्चा करण्यात आली. नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी शासन व प्रशासनाने एकत्र समन्वय साधून सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. श्रावणबाळ योजनेत येणाऱ्या सर्व अडचणी तत्काळ दूर करून त्याचा लाभ गरीब जनतेला मिळेल त्याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे शासकीय लाभांसाठी गरीब नागरिकांची कोणाकडून फसवणूक होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. योजनांसाठी आलेल्या सर्व अर्जांमधून पात्र अर्ज लवकर मंजूर करून घ्यावेत, असे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. पिक विम्याची वस्तूस्थिती काय आहे, हे जाणून घेऊन ती जनतेसमोर मांडावी. पिक विमा मंजूर झालेले तसेच मंजूर न झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांची यादी देण्याची सूचना यावेळी केली. याचबरोबर शेतरस्त्यांचे प्रश्न गावपातळीवरील पंचायतींमध्येच मिटवून घ्यावेत. हे वाद गावपातळीवर मिटवण्यासाठी १५ जुलैनंतर ‘झिरो वाद’ मोहीम राबवून रस्त्यांचे प्रश्न सोडवावे. ज्या ज्या रस्त्यांच्या तक्रारी नाहीत त्यासर्व रस्त्यांची यादी तयार करून एका आठवड्याच्या आत या रस्त्यांच्या ७/ १२ वर नोंदी करून घ्याव्यात, असे निर्देश आ. संभाजीराव पाटील यांनी दिले. राशन पुरवठ्यामध्ये देखील येत असलेल्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात. प्रशासनाची कामे ही प्रशासकीय टेबलवरच आणि वेळेत व्हावीत. विद्यार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्रे देखील वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना सर्वांना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शरदजी झाडके, निलंगा तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, देवणी तहसीलदार सोमनाथजी वाडकर, शिरूर अनंतपाळ तहसीलदार लालासाहेब कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.