उमरगा:- पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास मोठ्याप्रमाणात उत्पादनात अपेक्षित नसते.खरच उत्तम शेती करुन मोठ्याप्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास जमीनीचे आरोग्य महत्वाचे असते असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी डी.बी.रितापूरे यांनी केले.

तालुक्यातील पेठ सांगवी येथे दि. 5 रोजी जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून रितापूरे बोलत होते.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य उत्पादन कार्यक्रम रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत विविध उपक्रमांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी डी. बी. रितापुरे यांनी माती परीक्षणाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “माती तपासणी ही शाश्वत आणि नैसर्गिक शेतीची पहिली पायरी असून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खत वापराचे नियोजन केल्यास पिकाची उत्पादन क्षमता लक्षणीय वाढते.”तसेच कृषी मालावर आधारित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, सद्यस्थिती त मजूरटंचाईवर मात करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांनी भर देण्याचे आवाहन केले व कृषी यांत्रिक करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी यांत्रिकीकरण योजनांची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई पिकांचे किड रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एम. यू. सय्यद यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देत नैसर्गिक शेतीत माती तपासणी व स्थानिक निविष्ठांचे महत्त्व स्पष्ट केले. अमोल बलसुरे सहाय्यक कृषी अधिकारी व गर्जे पाटील यांनी कृषी विभागामार्फत विकसित केलेले शेतकऱ्यांना उपयुक्त असे महाविस्तार AI App चा उपयोग कसा करावा याबद्दल माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष महाविस्तार AI App डाउनलोड करून दाखवले आणि त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.प्रगतशील शेतकरी संभाजी बिराजदार यांनी दशपर्णी अर्क, बीजामृत, जीवामृत यांसारख्या नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे अनुभव कथन करत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.सदर प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक शेती अभियानातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर करके यांनी केले.कृषी सखी रूपाली महाजन यांनी नैसर्गिक शेतीमधील गावातील सद्य स्थिती, गटातील शेतकऱ्या कडून निविष्ठा निर्मिती याबाबत माहिती दिली.या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रदर्शन कृषी सखी प्रभावती महाजन यांनी केले.कार्यक्रमास पेठसांगवीचे सरपंच प्रतिनिधी शब्बीर मुजावर, उपसरपंच सिराज शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .


